माझ्या मराठीचिये बोलू कवतिके
नोकरीच्या निमित्ताने खूप भटकंती करावी लागली.
अर्थातच विविध प्रकारांचे अनुभवही गाठी आले. असंच एकदा एका यंत्राच्या तपासणीसाठी
मला नेपाळला जावं लागलं. कामाची साईट लुम्बिनी, गौतम बुद्धांच जन्मस्थान, नेपाळ इथे होती. हे गाव गोरखपूर बॉर्डर
जवळच आहे. माझं काम काठमांडूला सुद्धा होत. पण वेळापत्रका प्रमाणे आधी लुम्बिनीला
जाण भाग होत म्हणून मुंबई-दिल्ली-काठमांडू-भैरवा असा विमानाचा प्रवास केला. नेपाळ
आपल्यापेक्षा किमान ५० वर्ष तरी मागे. त्यामुळे तिथला तो विमानतळ म्हणजे
झाडाझुडपांच्या मध्ये उभी एक बिल्डींग, जिथे टॉयलेटची सुद्धा सोय नाही, अस होत.
भैरवा ते लुम्बिनी २० एक मैल प्रवास असेल. तिथे मला घ्यायला साईटवरचे काही लोक आले
होते. साईटवर जाता जाता त्यांनी मला ‘शुभवर्तमान’ दिल की मी ज्या यंत्राच्या
तपासणीसाठी आलो होतो ते यंत्र चालाविण्यासाठीच डिझेल इंजिन (प्राइम मूव्हर) बिघडलं
आहे आणि त्याचे पार्टस् आणण्यासाठी साईट इंजिनिअर दिल्लीला गेला आहे, चार दिवस
काहीही काम होणार नाही. मी हतबुद्ध! पण काय करणार? म्हटलं ठीक आहे. आत्ता साईटवर
जाऊ. पण त्याआधी उद्याचं काठमांडूच तिकीट
काढू म्हणजे मी तिथलं काम तरी उरकून घेईन. त्यांनी सांगितलं की काळजी करू नका.
तिकीट संध्याकाळ पर्यंत तुमच्या हातात पडेल. साईटवर अर्थातच सुनसान होत. मी
तपासण्या साठी आलेल यंत्र म्हणजे एक जवळ जवळ ४० फूट उंच मनोऱ्या सारख होत.
मावळत्या संधीप्रकाशात ते जरा भितीदायाकच दिसत होत. तिथल्या ऑफिस मध्ये जाऊन त्या
यंत्राची जुजबी माहिती गोळा केली आणि आता मुक्कामी हॉटेलवर जाऊ अस म्हटलं. ती
मंडळी म्हणाली सध्या साईट बंद असल्यामुळे आमचे कुटुंबीय इथे राहायला आले आहेत
म्हणून आम्ही तुमची सोय गेस्ट हाउस मध्ये केली आहे. जेवण वगैरे आटपल्यावर मग
तुम्हाला तिकडे सोडू. जेवण गप्पा मारत जरा आरामातच उरकलं. मला वाटलं होत की गेस्ट
हाउस तिथेच असेल पण ते म्हणाले की नाही ते थोडं लांब आहे तुम्हाला जीप ड्रायव्हर
सोडेल. मी निघालो. अष्टमीची रात्र असावी. थोडा मंद चंद्र प्रकाश पसरला होता. आता
या लोकांच्या क्वार्टर्स एकीकडे, गेस्ट हाउस दुसरीकडे, आणि साईट मध्यभागी.
लुम्बिनी छोट गांव असल्यानं सगळ निर्मनुष्य! एक मळलेला रस्ता, आजूबाजूला वाढलेलं
जंगल, लांबवर लुकलुकणारा एखादा दिवा असा आमचा प्रवास चालू झाला. ड्रायव्हरशी थोड्या
गप्पा मारायचा प्रयत्न केला. तो म्हणाला इथे बुद्धाचा जन्म झाला म्हणून बरेच लोक
इथे भेट देतात बाकी इथे काही नाही. इथले सर्व
लोक दूर दूर राहतात. जाता जाता परत साईट वरच्या त्या यंत्राच दर्शन झालं. एकुलता
एक उभा राहिलेला तो मनोरा आता भेसुरच दिसत होता. थोडं पुढे गेल्यावर एका कुंपणात
बरेचसे चौथरे आणि त्याच्या शेजारी प्रचंड बुद्ध विहार दिसला. हे बुद्धाच जन्मस्थान
आणि यशोधरेचा महाल. ड्रायव्हरन माहिती पुरवली. त्यावेळी ते दृष्य अर्थातच फार काही
आनंददायक नव्हत! अर्ध्या एक तासाच्या प्रवास नंतर आम्ही एकदाचे त्या गेस्टहाउसवर
पोहोचलो. ते एकूण सर्व वातावरणाला साजेसंच होत. मध्ये एक छोटी झोपडी सारखी इमारत
आणि बाजूला, सेल्युलर जेल असावा, तसे सूर्य किरणां सारखे पसरलेले, खोल्यांचे
विभाग. तिथे स्वत:ला मँनेजर म्हणवणारा एक जण उभा होता. ‘तुमचीच वाट पाहत होतो’ तो म्हणाला.
ड्रायव्हरने माझी बँग आणून दिली आणि उद्या सकाळी घ्यायला येतो असं सांगून निघून
गेला. रजिस्टर मध्ये माहिती भरता भरता मी त्या मँनेजरशी उगाचच फुटकळ गप्पा मारत
होतो. त्याला म्हटलं गावाच्या मानाने तुझं हॉटेल खुपच मोठ दिसतंय. तो खुष! किती
खोल्या आहेत विचारल्यावर तो म्हणाला ‘३५ खोल्या आहेत’. इतकी माणस इथे येतात? असा
प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला ‘हो. बुद्धाच्या जन्म ठिकाणाला भेट द्यायला जपान, थायलंड, कोरिया, वगैरे देशातून बरेच लोक
येतात’. अरे वा, आज किती लोक आहेत विचारल्यावर तो म्हणाला, ‘नाही आज तुम्हीच फक्त’.
मी जरा चिंतेतच पडलो. त्याला विचारलं तू इथेच राहतोस ना? त्यावर तो म्हणाला ‘नाही
नाही मी तुमचीच वाट बघत थांबलो होतो. आता मी माझ्या घरी गावात जाणार’. मी गार!
त्या जंगलात ३५ खोल्यांच्या हॉटेल मध्ये रात्रभर एकट्याने राहायची कल्पना फार सुखावह
नव्हती. पण सांगतो कोणाला? समान घेऊन खोली गाठली. खोली कसली? एक कॉट, टेबल,
खुर्ची, कॉयर मॅटिंग, मिणमिणता पिवळा दिवा बस्स. दरवाजा सुद्धा आपल्या कडच्या
जुन्या वाड्यातल्या सारखा, फळकुटांचा. एकुलत्या एका खिडकीचा तोच अवतार. मनाचा
हिय्या करून दार बंद केलं, टेबल ओढून दाराला लावलं खिडकी आतून घट्ट लावली आणि कपडे
न बदलता त्या कडक गादीवर आडवा झालो. रात्री नाट्यमय अस काहीही घडल नाही – नाहीतर
हे लिहायला मी शिल्लकच नसतो – सकाळी रीतसर उठलो तो पर्यंत तो मँनेजरसुद्धा आला
होता. चहा, ब्रेकफास्ट घेऊन जीप मधून परत साईटवर आलो. काठमांडूची फ्लाईट दुपारी
दोनची होती म्हणून तिथे थोडा वेळ काढून जेवण उरकून जीपने भैरवाला आलो. चेक इन
करायला गेलो तर पुन्हा एक धक्का! ‘आज नेहेमीचं विमान न येता छोट विमान येणार आहे.
नंबराप्रमाणे पहिले थोडेच प्रवासी जाऊ शकतात. सबब, ‘तुमच तिकीट कन्फर्मड असल तरी
तुम्हाला जागा नाही’. ‘बसा आता शंख करत’ मी मनात म्हटलं. पर्याय? रात्रभर प्रवास
करून बसने जाणे! पुन्हा तडफडत गावात येऊन रात्री ९ च काठमांडूच्या बसच तिकीट काढल.
बस म्हणजे काय ट्रकची डागडुजी करून सीट्स वगैरे बसवलेल्या! प्रवास सतत दुर्गम
डोंगरांमधून. कित्येक बसेस मधेच गायब होण्याची ख्याती. नशिबावरच हवाला ठेवायचा.
असो. दुपारचे चारच वाजले होते. बराच वेळ हातात होता म्हणून मग गावात फेरफटका मारला
त्यावेळी आपल्याकडे मिळत नसलेल्या बर्याच जपानी वस्तू बाजारात होत्या. त्यांची थोडी
फार खरेदी वगैरे केली. संद्याकाळ झाल्यावर एका हॉटेलात पोट पूजा करून बस स्टॅन्डवर
पोहोचलो. तिथे पाहतो तर तोबा गर्दी उसळलेली. पशुपतीची कुठची तरी यात्रा असल्याने
बरीचशी साधू मंडळी त्यांचे कमंडलू त्रिशूल वगैरे घेऊन सज्ज झालेली. चपट्या
नाकांची, जुने पुराणे जाडजूड (सैन्यातले टाकून दिलेले असावेत) लोकरीचे कोट घातलेली मंडळी सामानाचे ढीगच्या ढीग घेऊन
अगम्य भाषेत कलकलाट करत घुसाघुशी करत होती. थोडाफार पांढरपेशा दिसणारा मीच एकटा.
रिझर्वेशन असल्यान माझी पुढची सीट आणि शेजारची सीट सुद्धा मोकळीच होती. मी जरा
धास्तावालेलाच होतो. एव्हढा रात्रभराचा प्रवास कसा व्हायचा? आणि शेजारी कोण येणार?
इथे गुंडगिरी वगैरे असेल का? पण मनाचा हिय्या करून एकदाचा बस मध्ये चढून सीटवर
बसलो. ड्रायव्हरने बस सुरु केल्याकेल्या एक तरणाबांड, गोटीबंद शरीराचा, गोरापान
नेपाळी मुलगा उडी मारून माझ्या शेजारी येऊन बसला. मला त्यातल्या त्यात दिलासा! एव्हढ्या
थंडीतही त्याने छाती उघडी टाकलेलं जाकीट आणि जीन इतकाच पोशाख केला होता. बस चालू
झाल्यावर आतमधला कोलाहल जरा कमी झाला. थोडं स्थिरस्थावर झालं. मी मग हळू हळू त्या
मुलाशी संभाषण साधायचा प्रयत्न केला. त्याला इंग्रजी किंवा हिंदी काहीच येत नव्हत.
कसनुस हसून तो माझ्या बोलण्याला साथ द्यायचा प्रयत्न करत होता. मला एव्हढंच कळल कि
त्याला नेपाळ सरकारची स्कॉलरशिप मिळाली असून तो पुढे चीनला जाण्यासाठी काठमांडूला
चालला आहे. मोडक्या तोडक्या हिंदीतून मी त्याला विचारलं ‘आलास कुठून’? ‘मुंबईहून’ तो म्हणाला. ‘पण तुला तर
इंग्रजी हिंदी येत नाही मग मुंबईत तू काय करतोस? त्याच उत्तर ‘मला मराठी येत ना’.
त्या हजरो फुट उंचीवर मी आणखी अजून काही हजार फुट उडालो. माझी प्रिय मातृभाषा कुठे
पर्यंत पोहोचली आहे ते पाहून मी पूर्णपणे सर्द झालो. मग काय गप्पाच गप्पा सुरु
झाल्या. त्याच मुंबईत मार्शल आर्ट स्कूल होत. कसली स्कॉलरशिप आहे विचारल्यावर तो
म्हणाला ‘किक बॉक्सिंगची’. म्हटलं चला आता सुरक्षेची काळजी नाही. ‘तू आता तीन
महिने नाहीस मग तुझ्या स्कूलच काय’? विचारल्यावर म्हणाला ‘ माझा चेला आहे ना’.
पुन्हा मी गार. चेला हा शब्द मी सुद्धा वापरला नसता. काठमांडूला उतरल्यावर त्याला चहा प्यायला चल म्हणून आग्रह केला तर
‘माझ भाग्य म्हणून तुमच्याशी ओळख झाली’ म्हणून झपझप चालत निघून सुद्धा गेला. मी
त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे कितीतरी वेळ बघतच राहिलो.
----सुरेश
नातू,
अप्रतिम वर्णन. असेच लिहीत रहा.
ReplyDeletePlease visit my blog at http://gadremandar.blogspot.in
मस्त !
ReplyDelete